

रत्नागिरी : आईच्या मालमत्तेच्या वादातून बहिणीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना २५ मे रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास तीवंदामाळ, ता. राजापूर येथे घडली. याप्रकरणी पम्मी फूलचंद जयस्वार वय ४३, सध्या रा. गणेशधाम चाळ, संतोष भवन, नालासोपारा पूर्व) यांनी तक्रार दिली आहे. मंगल बाबूलाल हडाळे (५०), मानसी वैभव मासये (२३) आणि वैभव मासये (रा. मंदसुळ गणेशवाडी, ता. राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, फिर्यादी पम्मी जयस्वार या आपल्या आई पार्वती, मुलगा मेघराज आणि बहीण पुष्पा यांच्यासह राजापूर येथे आल्या होत्या. आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्कावरून दोन्ही कुटुंबांत पूर्वीपासून वाद सुरू होता. दरम्यान, तीवंदामाळ येथे आल्यानंतर संशयित वैभव मासये याने फिर्यादींना शिवीगाळ करत ‘तू परत मुंबईला जाणार नाहीस,’ अशी धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर संशयितांकडून लाकडी बांबू व पाइपने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पुष्पा गणेश पुजारी, पार्वती सीताराम मासये, पम्मी फूलचंद जयस्वार आणि मेघराज फूलचंद जयस्वार हे जखमी झाले. याप्रकरणी राजापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.