

रत्नागिरी : मान्सूनला सुरुवात झाली असून कोकण रेल्वे मार्गावर सोमवार, १५ जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू होणार असून ट्रेनचा वेग कमी होणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत हा कालावधी लागू राहणार आहे. पावसाळ्यामध्ये सुरक्षेसाठी तीन ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष आणि ६५७ कर्मचाऱ्यांचा जागता पहारा राहणार आहे. नद्यांना येणाऱ्या पुरामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाशिष्ठी आणि माणगाव येथील पुलांवर फ्लड वॉर्निंग सिस्टीम लावण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेच्या पथकाकडून संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार ठिकठिकाणी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने सुरक्षित आणि विश्वसनीय रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाय, रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम, वाढीव गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद सज्जता यावर लक्ष केंद्रित करणारी एक सर्वसमावेशक मान्सून तयारी योजना लागू केली आहे. भू-सुरक्षा व मॉनिटरिंग सिस्टीममधील सततच्या प्रगतीमुळे, कोकण रेल्वे मान्सूनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यासाठी भूवैज्ञानिक रचना मजबूत करण्यासाठी आणि दगड कोसळणे टाळण्यासाठी बोगदे आणि कटिंगमध्ये रॉक बोल्टिंग आणि शॉट क्रिटिंगची कामे सुरू आहेत. धोके कमी करण्यासाठी गॅबियन भिंती, रिटेनिंग भिंती, मायक्रोपाइल्स आणि बोल्डर नेटिंग यांसारख्या संरक्षक संरचना बसवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील पाण्याचा प्रभावी निचरा होण्यासाठी साइड ड्रेन्स (बाजूचे नाले) आणि कॅचवॉटर ड्रेन्स (पाणी साठवणारे नाले) यांची स्वच्छता आणि काँक्रीट लायनिंग पूर्ण झाली आहे. धोकादायक ठिकाणी पोर्टेबल पाणी उपसा पंप तैनात करण्यात आले आहेत.
चोवीस तास गस्त घालण्यासाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्ना येथे बीआरएन वॅगन्सवर बसवलेली जेसीबी यंत्र मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्ना, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ ठिकाणी 'रेल मेंटेनन्स व्हेइकल्स' तैनात करण्यात आली आहेत. तातडीच्या कार्यवाहीसाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे 'टॉवर वॅगन्स' सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.