

रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झालेली आहे. धोकादायक, वर्ग खोल्या दुरूस्ती निधी अभावी राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा दुरुस्ती, नवीन बांधकाम तसेच सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निधीचे वाट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५३ शाळांच्या इमारतींच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही शाळा दुरुस्तींचे काम झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक नुकतीच अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शाळा दुरुस्तीसाठी १४ कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र इतका निधी पुरणार नसून तब्बल २२ कोटींची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांना ही जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करण्यात आली आहे. रविवारी शाळा दुरुस्तीचा व शाळा वर्गखोली बांधकाम याबाबत आढावा घेणार असल्याचे शिक्षण सभापती मुरकर यांनी सांगितले.
७७ शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीची उभारणी आणि रंगरंगोटी अशा सुशोभीकरणाच्या कामांसाठी ६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, १४ कोटी रुपयांचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर कामांना गती मिळणार आहे.