

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्य भाविकांसाठी सवलतीच्या दरात आणि सुरक्षितरीत्या धार्मिक स्थळांची वारी करता यावी यासाठी एसटी संगे तीर्थाटन ही विशेष योजना सुरू केली. रत्नागिरी विभागात 9 आगारात नियोजन करण्यात आले होते; मात्र, प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळत असल्यामुळे योजनेतून अद्याप एसटी बसेस धावल्या नाहीत.
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूणाईसह सर्व कुटुंबाना धार्मिक तीर्थस्थळांना भेटी द्यायचे असेल तर खासगी ट्रॅव्हल्सचे दर वाढलेले आहे. त्यामुळे प्रवासी एसटी आणि रेल्वेचा आधार घेतात. प्रवासातील सुरक्षितेतचा अभाव लक्षात घेता एसटी महामंडळाने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात हे धार्मिक पर्यटन आयोजित केले आहे. मात्र असे असले तरी याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
9 आगारातून या बसेस प्रामुख्याने पंढरपूर, कोल्हापूर, अंबाबाई, नृसिहवाडी, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटसह कोकणातील धार्मिक स्थळे असे विविध धार्मिक पर्यटनस्थळी एसटी बसेस धावणार आहेत. या माध्यमातून नव्या स्मार्टबसेस देण्यात येणार होते. 15 फेब्रुवारीपासून ही या योजनेतून एसटी बसेस धावणार होत्या; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अद्याप ही योजना सुरू झालेली नाही. दुसरीकडे पुणेसह इतर जिल्ह्यात तीर्थाटन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.