

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
चिल्लर पैशांचा वादा, नको कटकट, करा डिजिटल पेमेंट म्हणत एसटी महामंडळाच्या वतीने डिजिटल तिकीट प्रणाली सेवा सुरू केली. याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मागील काही दिवसांपासून रत्नागिरी विभागात सर्व्हर डाऊन तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन पेमेंट होत नाही.
कधी सुरू होतेत तर कधी अचानक बंद होत आहे. त्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. प्रवाशांनो आता खिशात रोख पैसे ठेवा, अन्यथा डिजिटल पेमेंटच्या भरवशावर बसल्यास चांगलाच फटका बसणार आहे. रत्नागिरी एसटी विभागातून दररोज लांब पल्ल्याच्या व जिल्हांतर्गत बसेस धावत असतात.
दररोज लाखो प्रवासी लालपरीने प्रवास करतात. वाढत्या गर्दीत चिल्लर, सुट्टे पैशांचे वाद होऊ नये, प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने डिजिटल पेमेंट पध्दत सुरू केली. त्यामुळे यूपीआयने एसटी तिकीट काढता येते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून रत्नागिरी विभागात ही यूपीआय पेंमेट करणाऱ्यांची संख्या वाढली.
मात्र आता काही दिवसांनी डिजिटल पेमेंट होत नाही. वाहक ऑनलाईन सेवा बंद आहे, रोख पैसे द्या नाहीतर खाली उत्तरा असे वाहक आधीच सांगत आहे. त्यामुळे मोठा बाद होत आहे. लवकरात लवकर मशिनची दुरुस्ती करून डिजिटल पेमेंट सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. सुट्या, चिल्लर पैशांवर पुन्हा वाद एसटी महामंडळाने अर्धवट भाडेवाढ केल्याने तिकीट ५१, ८१ व १२२ असे होत आहे. उर्वरित १, २ रुपये चिल्लर पैशांवरून वाहक व प्रवाशात पुन्हा वाद होत आहेत.
जिल्हांतर्गत राजापूर, लांजा या मार्गावर प्रवास करताना काहीवेळेला पैसे नसताना ऑनलाईन पेमेंट करतो. मात्र काही दिवसांपासून ऑनलाईन पेमेंट बंद आहे. तर कधी पेमेंट होत नाही. त्यामुळे खिशात रोख पैसे ठेवावे लागत आहे. अन्यथा मोठी अडचण होत आहे. एसटी प्रशासनाने मशिन दुरूस्ती करून ऑनलाईन तिकीट सेवा सुरू करावी.
- समीर पाटील, प्रवासी