

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ई-बसेस रस्त्यावर कधी धावतील यासाठी कोकणकर वाट पाहत आहेत. शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. बाहेरील जिल्ह्यातील चाकरमानी रत्नागिरीत कामास आल्यामुळे गर्दी वाढली आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरात मोजकेच स्मार्ट बसेस, जून्या बसेस धावत आहेत. जिल्हांतर्गत असणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. अनेक मार्गावर स्मार्ट बसेस धावत नाहीत. प्रवाशांची बसची मोठी मागणी असल्यामुळे जिल्ह्यासाठी 151 ई -बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी रत्नागिरी शहरासाठी 30 ई- बसेस मंजूर आहेत. गणेशोत्सव, दिवाळीत, नव्या वर्षात ई-बसेस येतील अशा केवळ घोषणा झाली.
दापोली तालुक्यात ई-बस सुरू झाली ती वगळता रत्नागिरी, चिपळूण, खेड तालुक्यात चार्जिंग स्टेशनच्या कामामुळे ई-बसेसचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. आता आणखी काही महिने लागतील असे सांगण्यात आले. कोकण विभागातील रत्नागिरी आगारासाठी एकूण 151 नवीन ई-बसेस मंजूर आहेत. त्यापैकी रत्नागिरी आगारात 30 ई-बसेस येणार आहेत. रत्नागिरी येथील काम अंतिम टप्प्यावर असून चिपळूण, खेड येथील काम काहीच महिन्यापासून सुरू झाले आहे. मागून दापोली येथील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी 35 ई-बसेस आल्या असून रस्त्यावर धावत आहेत.
रत्नागिरीसह खेड, चिपळूण येथील चार्जिंग स्टेशनचे काम अनेक कारणांमुळे लांबत आहे. पूर्वी गणेशोत्सवात ई-बसेस रस्त्यावर धावतील, असे सांगण्यात आले. तो ही मूहूर्त हुकला. त्यानंतर दिवाळी, नवीन वर्षात बसेस धावतील, असे सांगूनही मुहूर्त हुकलेला आहे. आचारसंहिता, संथगतीने काम यासह विविध कारणांनी अद्याप चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण न झाल्यामुळे रत्नागिरीसह दोन ठिकाणच्या ई-बसेसचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना ई-बसेसमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.