

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून रस्ता खचला असून, अनेक ठिकाणी भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मंगळवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासमवेत आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली.
आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव एसटी वाहतूक तसेच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.