

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. दिवस-रात्र मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 6 जुलैपर्यंत 10 हजार 973.86 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 1,213.32 इतका पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे.
कोकणासह राज्यभरात मान्सूनचा पाऊस आठ दिवस अगोदर आल्यामुळे पावसाने हाहाकार माजवले होते. कित्येक जिल्ह्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या नंतर मान्सून पावसाने ही कोकणात दमदार हजेरी लावली. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ता खचला होता. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. वीज पडून कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला. घरांची पडझड होऊन रत्नागिरी येथील कित्येक नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले.
यंदा पावसाने लवकरच आगमन केल्यामुळे बळीराजा खूष होवून खरीप पेरण्यासाठी नागरणी करुन त्यापाठोपाठ पेरण्याही केल्या. जिल्ह्यात भात, नाचणीसह विविध पिकांच्या 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 1 जून ते 6 जुलै पर्यंत 10973.86 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाऊस आणखी दमदार पडला असून जूनबरोबरच जुलै महिना कोकणासाठी लकी ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कोकणातील शेतकर्यांकडून भात लागवडीसाठी लगबग सुरू आहे. भर पावसात शेतकरी, मजूर हे भातांची लागवड करीत आहेत. काही तालुक्यातील भात लागवड पूर्ण झाली आहे तर काहींची बाकी असून लगबग सुरू आहे. लवकरच भात लावणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात 6 जुलै रोजी खेड-भरणे पूल येथील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. 5 मीटरपर्यंत इशारा पातळी असून, सध्या 5.10 मी. इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच लांजा-आंजणारी पूल इशारा पातळी 16.50 मी. इतकी असून, तेथील सध्याची पाणी पातळी 14.60 इतकी आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास ही नदीही धोका पातळी ओलांडू शकते. तसेच वाशिष्ठी 2.46, शास्त्री 3.80 मी, सोनवी नदी 3.20, कोदवली नदी 3.60, मुचकुंदी 1.60, बावनदी 6.57 मी. इतकी सध्याची पाणी पातळी आहे.