

राजापूर : तालुक्यातील केळवली फाटा जामदे पुलाजवळ शनिवारी सकाळी ७ वाजता एसटी बस आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील ३ प्रवासी जखमी झाले. एसटी चालकाने कारला धडक देत फरफटत नेले. मात्र, कार चालकाच्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये एसटी व कारचे मोठे नुकसान झालेे.
याप्रकरणी कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, देवगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालकाविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कारमधील युधीराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (२५) आणि राज रामदास म्हाळवदे (२२, तिघेही रा. शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार अमित साटम हे कार (एमएच-०७ बीजी ९०९७) घेऊन सिंधुदुर्ग-शिरगाव येथून मित्रांसह प्रवास करत होते. ते केळवली-पाचल मार्गे अणुस्कुरा दिशेने पुणेकडे जात असताना वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा रिंगेवाडी-खारेपाटण एसटी बस (एमएच- २० बीएल ३०७९) चालक गणपती भाऊसाहेब जाधव (४७) हे चालवत होते. या बसवर वाहक म्हणून दशरथ गोविंद जाधव हे होते. ही एसटी बस केळवली फाट्यावरील जामदे पुलाच्या जवळ आली असताना वळणावर एसटी चालकाने भरधाव बस चालविल्याने समोरून येणाऱ्या या कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावर एसटीबरोबरच फरफटत गेली. यामध्ये ३ जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, हेडकाॅन्स्टेबल रहीम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. राजापूर एसटी प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राजापूर अगारप्रमुख काव्या पेडणेकर वाहतूक नियंत्रक अजय सिडाम यांनी अपघातस्थळी धाव घेतली, तर विभागीय वाहतूक अधीक्षक सिंधुदुर्गचे नीलेश लाड यांनीदेखील तत्काळ अपघातस्थळी भेट दिली. या अपघातात एसटी बसचे ४० हजार रुपये, तर कारचे ६० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एस. टी. चालक गणपती जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.