Kaljhundi dam : कळझुंडी धरणात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

वाटद विभागातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Kaljhundi dam
Kaljhundi dam
Published on
Updated on

रत्नागिरी : जयगड नळपाणी (प्रादेशिक) योजनेअंतर्गत कळझोंडी धरणातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे वाटद विभागातील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या वर्षी धरणाचे नूतनीकरण झाल्यानंतरही परिसरात स्वच्छ पाणी मिळण्याऐवजी पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणाच्या नवीन भिंतीमधून पाईपलाईन टाकून पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे. मात्र धरण क्षेत्रात साचलेला पालापाचोळा आणि जंगली प्राण्यांची विष्ठा कुजल्यामुळे या पाण्याचा रंग पिवळा झाला असून त्याला प्रचंड दुर्गंधी येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे धरणात पुढील 7 वर्षे पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करत दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक स्तरावर धरणाचे सुपरवायझर निंबरे आणि अभियंता दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. दूषित पाण्यामुळे एखादी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून एका पत्राद्वारे करण्यात आला आहे. या परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. येत्या 8 दिवसांत पाणी शुद्ध करून पुरवठा न केल्यास, कळझोंडी धरण आणि संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा काकासाहेब मुळ्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या आंदोलना दरम्यान काही अघटीत घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news