

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील प्रसिध्द पीरबाबा शेख यांच्या उरूसाला सुरूवात झाली आहे. या उरूससाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्गाला गर्दी करीत असतात त्यामुळे 2 व 3 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी विभागाच्या वतीने 16 एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत एसटी बसेसच्या फेऱ्या असणार आहे. गर्दी वाढल्यास आणखीन गाड्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक बालाजी आडसुळे दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
हातीस येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रसिध्द असे पीर बाबाशेख यांचे उरूस दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात असते. या उरूसाला मुंबई, पुणेसह राज्यभरातून हजारो भाविक रत्नागिरीत येत असतात. यावेळी त्यांची गैरसोय होवू नये म्हणून रत्नागिरी आगाराच्याव वतीने 16 हून अधिक एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बसेस हातीस जाण्यास सुरूवात झाले आहे. दुपारी 3 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जादा गाड्या धावणार आहेत. आणखीन गर्दी वाढल्यास, मागणी आल्यास जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपच्या वतीने शहरातील बसस्थानक, विविध थांब्यावर पोस्टर ही लावण्यात आले आहे. जादा बसेसवर हातीस उरूस यात्रा स्पेशल असे पोस्टर लावण्यात आले असून भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.