

रत्नागिरी : कोकणात लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात वाजतगाजत घरोघरी, सार्वजनिक मंडळात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 552 तर 126 सार्वजनिक श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनानंतर मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात गणेश भक्तांकडून गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी समुद्र किनारे, विसर्जन ठिकाणी सोय करण्यात आली आहे. विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. विसर्जनासाठी शहर, ग्रामीण पोलिस प्रशासन, नगर परिषद, ग्रामीण भागातील नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीनिमित्त लाडक्या बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून सार्वजनिक, घरोघरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय कोकणातील आपल्या मूळ गावी आल्यामुळे जिल्हा गजबजला आहे. गणेशोत्सवामुळे सर्व कुटुंबीयांनी एकत्रित येत भक्तिभावाने लाडक्या बाप्पाची पूजा केली. घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्यात आले होते. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ गजर करीत दीड दिवसाच्या तब्बल 13 हजार 844 घरगुती तर 7 सार्वजनिक गणरायांना भक्तिभावात निरोप दिला. त्यानंतर रविवारी मोठ्या उत्साहात गौराईचे आगमन जिल्ह्यात झाले. दरम्यान, मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील घरगुती, सार्वजनिक गणपती, गौराईचे विर्सजन रत्नागिरी शहरातील भाट्ये बीच, मांडवी समुद्र किनार्यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन सज्ज झाली आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभाग ही सज्ज झाले आहे.