

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. सुमारास घडली. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रेयश सागर गोसावी (13, रा. मेर्वी म्हादयेवाडी मांडवकर एसटी स्टॉपजळ, रत्नागिरी) असे समुद्रात बूडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील सागर मोहन गोसावी यांनी पूर्णगड पोलिसात खबर दिली. त्यानुसार, 10 एप्रिल रोजी सागर गोसावी हे त्यांचा मुलगा श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज सुनील गोसावी यांच्यासोबत गावखडी समुद्रकिनारी सुरूचे बन येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी 2 वा.च्या सुमारास श्रेयश, आरोही आणि देवराज ही तिन्ही मुले समुद्राच्या पाण्यात खेळत असताना ते तिघेही लाटेबरोबर पुढे-पुढे आत समुद्रात जात असल्याचे सागर गोसावी यांच्या लक्षात आले.
त्यांनीही तातडीने पाण्यात उडी घेत प्रथम पुतण्या देवराज आणि मुलगी आरोहीला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर ते श्रेयशला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना श्रेयश लाटेसोबत समुद्राच्या आत खोल गेल्याने दिसेनासा झाला. म्हणून त्यांनी याबाबत गावचे पोलिस पाटील, स्थानिक पोलिस, सुरक्षा रक्षक यांना याची माहिती दिल्यानंतर ते सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटीच्या सहाय्याने खोल पाण्यात श्रेयशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही. अखेर 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. सुमारास गावखडी सुरुचे बन येथे समुद्राच्या पाण्यात श्रेयशचा मृतदेह तरंगताना दिसून आला.