

आरवली/वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प १९८२-८३ साली पूर्ण झाला असून आतापर्यंत तब्बल ९४८.२७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र उघड्या कालव्यातून आणि बंदिस्त पाईपाद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नसल्याने गेल्या ४ वर्षांत शेतकऱ्यांना एकही थेंब पाणी मिळालेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावरच असल्याची टीका करण्यात येत आहे.
सदर कामाचे सध्याचे सुधारित अंदाजपत्रक ११६३.४० कोटी रुपयांचे असून ते वरिष्ठ विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मात्र मंजुरी न मिळाल्याने काम बंद आहे. एवढा मोठा निधी खर्च होऊनही पाणीपुरवठा होत नसल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे. या धरणाचा समावेश पी. एम. के. एस. वाय. योजनेत करण्यात आला आहे.
३१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
या धरणाखाली एकूण ३,१११ हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जर पाणीपुरवठा सुरू झाला तर दुबार भात शेती, दुबार भाजीपाला उत्पादन वाढून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे पंचायत समिती सदस्य महेश महादेव जड्यार यांनी सांगितले.
यासंदर्भात जड्यार यांनी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांना पत्र देऊन या प्रकल्पाबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानंतर कोकण प्रदेश, मुंबई येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडेही धामापूर तर्फे संगमेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य महेश जड्यार यांनी पत्र पाठवून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. "सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले, पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून प्रकल्प पूर्ण करून पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा," अशी मागणी महेश जड्यार यांनी केली आहे.