रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची लांबी सागरी किनार्याच्या लांबीपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठी तळी, सरोवरे, जलाशयांचे क्षेत्रही समाधानकारक आहे. जिल्ह्यातील भूजल मत्स्य व्यवसायाला गती देणार्या आवश्यक सुविधा नसल्याने भूजल मत्स्य व्यवसाय फारच मर्यादित राहिला. मात्र आता राज्याच्या मत्स्योद्योग विकासाचे धोरण बनवण्यासाठी नव्याने समिती स्थापन झाली आहे. या समितीकडून जिल्ह्यातील भूजल मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मत्स्योद्योग विकास धोरण तयार करण्यासाठी नवीन समिती गठित झाली आहे. या समितीने मत्स्योद्योग धोरण कसे असावे, याबाबतच्या सूचना अभिप्राय येत्या 6 ऑगस्टपर्यंत पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. मत्स्य व्यवसायाशी संबंधीत व्यावसायिक, मत्स्य संस्थांसह सर्वसामान्य मच्छिमारही आपल्या सूचना पाठवू शकणार आहे. या समितीचे अध्यक्ष राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य व्यवसायाच्या आयुक्तांसह इतर प्रमुख अधिकार्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोड्या पाण्यातील मासेमारी व भूजल मत्स्य पालन विषयक धोरणाचा अभ्यासही येणार्या अभिप्रायातून केला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. मंडणगड (20 कि.मी.), दापोली (35 कि.मी.), गुहागर (38 कि.मी.), रत्नागिरी (56 कि.मी.), राजापूर (18 कि.मी.) या तालुक्यांनाच समुद्र किनारा आहे. परंतु नद्या जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यात 40 कि.मी., दापोलीत 50 कि.मी., खेड 60 कि.मी., चिपळूण 80 कि.मी., गुहागर 160 कि.मी., रत्नागिरीत 45 कि.मी., संगमेश्वर 60 कि.मी. आणि लांजा, राजापूरात असणार्या नदीची लांबी प्रत्येकी 50 कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील ही नद्यांची लांबी 595 कि.मी. असून मत्स्य व्यवसायासाठी अनुकूल तळी, सरोवरे, जलाशयांचे क्षेत्र 916.24 इतके आहे.
जिल्ह्यातील सागरी लांबीपेक्षा नद्यांची लांबी जास्त आहे. मत्स्य व्यवसायासाठी असलेल्या एकूण क्षेत्रानुसार आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने भूजल व्यवसाय विस्तारु शकला नाही. भूजल मत्स्य व्यवसायाची गेल्या वर्षातील उत्पादन केवळ 34.50 मे.टन इतकेच होते. त्याचवेळी सागरी मासेमारीपासून मिळालेले उत्पादन 62 हजार 717 मे. टन इतके होते. भूजल मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असणारी बाजारपेठ, वाहतूक व्यवस्थेसह इतर आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे नव्याने धोरण ठरवण्यासाठी गठीत झालेली समितीने येणार्या अभिप्रायानुसार आवश्यक ते निर्णय घेतल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील भूजल मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे.