

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात मिळणार्या मासळीला चांगला दर मिळत आहे. परंतु समुद्रात मासळी मिळतच नसल्याने रत्नागिरीतील मच्छीमार्केटमध्ये जिल्ह्याबाहेरून येणार्या पॅकिंगच्या मासळीवर मच्छी व्यावसायिक अवलंबून आहेत. रविवारी स्थानिक समुद्रातील सरंग्याचा 1 किलोचा दर 700 ते 800 रुपये होता. त्याचवेळी पॅकिंगच्या सरंग्याचा दर 600 ते 650 रु. इतका होता.
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्राबाहेर जाणार्या मच्छीमार नौकांना मोठ्या प्रमाणात मासळी मिळाली तर त्या ठिकाणच्या स्थानिक मच्छीमारांची भीती असते. हे मच्छीमार रत्नागिरी किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील नौका दिसल्या तर त्यांच्या नौकेत असलेली मासळी मागून घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे फारच कमी प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार जिल्ह्याच्या समुद्र सोडून बाहेर दुसर्या समुद्रात जाण्याचे धाडस करत आहेत. जिल्ह्यात मासळी मिळत नसल्याने रत्नागिरीतील मार्केटमध्ये पॅकींगचा मासा आणून विकावा लागत आहे. रविवारी रत्नागिरीतील समुद्रातील सरंग्याचा दर 700 ते 800 रुपये किलो होता, असे मच्छी विक्रेत्या महिलांनी सांगितला. पॅकींगचा सरंगा 600 ते 650 रुपये दराने मिरकरवाडा बंदरावरून आणल्याचेही या महिलांनी सांगितले. मोरी किंवा वाटू मासा हा 150 ते 200 रुपये दराने मिळायचा तो 400 रु. किलो दराने बंदरावरून विकत घेवून तो विकावा लागत असल्याचेही सांगितले.
रत्नागिरीतील मच्छीमार्केटमध्ये पापलेटचे दर्शन दुर्लभच होते. पापलेट 1500 ते 1600 रु. दराने असल्याने तो विकण्यासाठी खरेदी केलेला नाही. इतका महाग मासा विकला गेला नाही तर पैसे वाया जाण्याची भिती असते. सुरमईचा 1 किलोचा दर 1 हजार रुपये, 150 ते 200 दराने मिळणारा सांदाळा रविवारी 350 किलो दराने बंदरावर विकला जात होता. लहान बांगडा 150 ते 200 आणि मोठा बांगडा 300 ते 400 रुपये किलो दराने होता. टायनी कोळंबी जी 150 ते 200 रुपये किलो दराने मिळत होती त्या टायनीचा किलोचा दर 300 रुपये होता. ओले बोंबील 150 ते 200 रुपये कि. दराने मिळायचे ते 350 रुपये दराने तर जी मांदेली 60 ते 70 रुपये किलो दराने मिळायची तिचा दर 100 ते 125 रुपये असा होता.