

रत्नागिरी : शहरालगतच्या कुर्ली समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर नौकेचे इंजिन बंद पडून वाऱ्याने भरकटत किनाऱ्यालगत येऊन अडकून पडला आहे. या नौकेच्या नुकसानीचा आणि घटनेचा पंचनामा सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आला; परंतु त्या नौकेचे किती नुकसान झाले आहे, हे ती नौका पाण्याबाहेर काढल्यानंतरच कळू शकणार आहे. समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी समुद्रातील वातावरण शांत झाल्यानंतरच नौका मासेमारीसाठी समुद्रात घालाव्यात, असे आवाहन सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी केले आहे.
कुर्ली समुद्रात अलरिझवान नावाची नौका शनिवारी मासेमारी करत असताना समुद्रात टाकलेले जाळे नौकेच्या पंख्यात अडकून नौकेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे ही नौका वाऱ्याने भरकटत तेथीलच किनाऱ्यावर येऊन रुतून पडली आहे. वाऱ्याने भरकटत येताना ही नौका खालच्या बाजूला फुटली आहे किंवा नाही, हेही नौका बाहेर काढल्यानंतरच समजू शकणार आहे. या नौकेच्या अपघात घटनेचा आणि नुकसानीचा प्राथमिक पंचनामा सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी केला आहे.
नौकेवरील खलाशी ठरले सुदैवी
इंजिन बंद पडून भरकटत आलेली ही नौका महम्मदमिया इब्राहिम मस्तानी यांच्या मालकीची आहे. नौकेत ७ खलाशी होते. वाऱ्याने ही नौका किनाऱ्यावर लागल्याने खलाशी सुदैवी ठरले. कोणतेही अघटित घडलेले नाही. नौका भरकटत येताना खडकावर आदळत किनाऱ्यावर आल्याने ती खालच्या बाजूने फुटली असावी, असा अंदाज आहे.