

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार 593 इतकी रक्कम झाली असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजअखेर 97.72 कोटी रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झाली असून उर्वरित शेतकर्यांच्या खात्यात त्रुटी असल्यामुळे अडचणी आल्या आहेत येत्या दोन दिवसात रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात वातावरण बदलामुळे आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून निघावे यासाठी केंद्र-राज्य सरकारने फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतंर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 30 हजार 135, तीन हजार 333 काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. एकूण 18 हजार 24 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. शेतकर्यांनी हप्त्यापोटी 21 कोटी 74 लाख भरले तर केंद्र राज्य आणि शेतकरी मिळून एकूण 108 कोटी 54 लाख रुपये विमा कंपनीला देण्यात आले होते. हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांत ट्रिगरची माहिती संकलित करून 45 दिवसांत परतावा देणे गरजेचे होते. मात्र तीन महिने हाऊनसुद्धा कंपन्याकडून ककोणतीच हालचाल झाली नाही. अखेर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून 33 हजार 563 बागायतदारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. उर्वरित बागायतदारांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यात काजूसाठी एकाही बागायतदाराला विमा परतावा मंजूर झालेला नाही. तसेच सर्वाधिक आंबा क्षेत्र असलेल्या या तालुक्यात तुलनेने विमा रक्कमही कमी मिळालेली आहे. संगमेश्वर, लांजा, मंडणगड या तालुक्यांमध्ये आंब क्षेत्र कमी असतानाही अधिक परतावा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. पाली, पावस परिसरातही परतावा रक्कमेतील तफावत येत आहे.