

रत्नागिरी : पिकांची उत्पादकता वाढवणे आणि नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, अटी आणि बक्षिसाची रक्कम तुटपुंजी असल्याने धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. भात पिकासाठी 171, नाचणी पिकासाठी 57 असे जिल्ह्यात फक्त 228 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे आणि त्यांच्या प्रयोगांचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विजेत्यांची निवड करून त्यांना गौरवण्यात येते. मात्र अनेक तालुक्यामध्ये एकही अर्ज प्राप्त झाले नाही. भात पिकासाठी जास्त अर्ज तर नाचणीसाठी संग्ामेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात एकही अर्ज आलेले नाही. शेतकऱ्यांच्या या पाठ फिरवीमागे क्लिष्ट अटी, कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणी आणि जनजागृतीचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते. स्पर्धेचा उद्देश चांगला असला तरी प्रशासकीय पातळीवर या योजनेचा प्रभावी प्रचार न झाल्याने शेतकरी स्पर्धेपासून दूर राहिल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थतीमुळे प्रयोगशील शेतकरी निर्माण करण्याचे कृषी विभागाचे स्वप्न धोक्यात आले आहे.
असे मिळते बक्षीस
तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे बक्षीस 2 हजार रूपये तर जिल्हा पातळीवर प्रथम 10 हजार दुसरे 7 हजार, तिसरे 5 हजार रूपये आहे. राज्य पातळीवर 50 हजार रूपयांचे प्रथम बक्षीस आहे. ही बक्षिसाची रक्कम तुटपुंजी असल्याने दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले.