

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 हजार 693 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी शुकवारी जिल्ह्यातील विविध केंद्रावर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी 223 एसटी बसेस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्तासाठी पोलिस, होमगार्ड आणण्यासाठी स्वतंत्र 35 बसेस नाशिकला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी शुक्रवार, शनिवारी जिल्ह्यातील स्थानिक मार्गावरील शालेय फेऱ्या बंद राहतील. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू राहरणार आहे तर खासगी कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचारी, व्यापारी यांच्यासाठी कार्यालयीन वेळेत, जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी एसटी बसेस धावतील.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडे 700 हून अधिक गाड्या आहेत. जिल्ह्यातील 9 आगारातून या बसेस शहरासह मध्यम, लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दिवशी गावाकडील बऱ्याच मार्गावरील बस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला मतदानादिवशी सुट्टी असणार आहे.
शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी एसटी बसेस लागणार आहेत. त्यामुळे 223 बसेस गाड्या निवडणुकीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. खासगी कर्मचारी, व्यापारीसह सामान्य प्रवाशांसाठी बस उपलब्ध असणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी एसटी बसेस धावणार असल्याचे सांगण्यात आले. बसेस निवडणुकीसाठी जाणार असल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा त्रास होणार असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार एवढं मात्र निश्चितं.