

रत्नागिरी : जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कच्या गंभीर समस्या दूर करण्यासाठी आता थेट तालुका पातळीवर नवीन सर्वेक्षण केले जाणार असून, नवीन कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल कव्हरेज आणि ४जी सुविधांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासकीय आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५३८ गावे आहेत. यापैकी १४७२ गावांमध्ये सध्या मोबाईल कव्हरेज पोहोचले आहे, तर १४६१ गावांमध्ये ४जी इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कागदोपत्री ही आकडेवारी मोठी दिसत असली, तरी जिल्ह्यातील अनेक डोंगराळ आणि दुर्गम गावांमध्ये आजही नेटवर्कची मोठी अडचण कायम आहे.