

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : दहावी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता जाहीर केली आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील 17 हजार 363 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना 121 महाविद्यालयांत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दहावीची परीक्षा झाल्या असून विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहे. मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीच्या परीक्षाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 17 हजार 363 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे, तर उपलब्ध जागांची संख्या तेवढीच आहे. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मात्र शहरातील नामांकित आणि टॉप महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेशाची मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
यंदा कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत जागा असून सर्वाधिक प्रवेश क्षमता विज्ञान शाखेची आहे. दहावीच्या परीक्षा संपल्या असून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना चुकू नये यासाठी माध्यमिक विभागातर्फे मार्गदर्शन केंद्रे उभारली जाणार आहे.
यंदाही विज्ञान शाखेकडे कल अधिक...
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा विज्ञान शाखेकडे असतो. त्याचबरोबर आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळणे अपेक्षित आहे. मेरीटनुसार प्रवेशा घेता येणार आहे. त्यानंतर वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेकडे कल वाढत चालला आहे. शेवटची कला शाखेत सहज प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांना स्पर्धा परीक्षासह इतर क्षेत्रात करिअर करायचे आहे. असे विद्यार्थी स्वत:हून कला शाखा निवडत असल्याचे चित्र आहे.