

दापोली : दापोली बाजारपेठेत 4 एप्रिल रोजी रात्री 10.30 वा.च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत दिलीप भैरमकर, परेश जैन, मालाराम चौधरी, अपी मोरे आणि संदीप राजपुरे या व्यापाऱ्यांचे अंदाजे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत पुढील नुकसान रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या पार्श्वभूमीवर दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी नागरिकांचे आभार मानत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर दापोलीच्या अग्निशमन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अग्निसुरक्षा अभियानांतर्गत दापोली नगरपंचायतीसाठी सुमारे 90 लाख रुपये खर्चाच्या नवीन अग्निशमन वाहनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला असून, खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र अग्निशमन संचालनालय, मुंबई स्तरावर सुरू झाली आहे.