

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी दिलेले सविस्तर मार्गदर्शन, सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांची आज बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद्र बिरादार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष अश्फाक कादरी, तालुका सचिव लक्ष्मीकांत मयेकर, वंचित बहुजन आघाडी गौतम गमरे, जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख प्रशांत सुर्वे, जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी गलांडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद गटासाठी 6 लाख व गणासाठी साडेचार लाख इतकी उमेदवारांनी करावयाच्या खर्चाची मर्यादा आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करुन त्यादिवशी अस्तित्वास असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या याद्या जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत. 3 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यानंतर सभा/प्रचार फेऱ्या /ध्वनिक्षेप आदीचा अवलंब करता येणार नाही. जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, आचारंसहितेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी.