

रत्नागिरी : शाळा-महाविद्यालयांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यामुळे जिल्ह्यात चाकरमानी व पर्यटकांची संख्या वाढू लागली असून त्याचा ताण सीएनजी पंपांवर पडत आहे. सीएनजी पंपावर चारचाकीसह रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. रणरणत्या भर उन्हातही जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीसाठी रांगा लावून वाहनचालक हैराण झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूरमधील सीएनजी पंपावर सिंधुदुर्ग व रत्नागिरीत येणारे चाकरमानी, गोव्याला जाणारे पर्यटक यांच्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेक वाहनचालक सीएनजी संपला तरीही सीएनजीच्या रिफिलिंग गाड्या येईपर्यंत उभे राहत आहेत.
चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली शहरांत तर स्थानिक रिक्षाचालकांनाही याचा फटका बसत आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना सीएनजीसाठी जास्तीत जास्त वेळ रांगेतच घालवावा लागत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात संगमेश्वर डिंगणी येथेच ऑनलाईन पंप असल्याने, त्याच ठिकाणी रिफिलिंग गाड्याही भरल्या जात असल्याने जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपावरील गाड्यांना एकाच रिफिलिंग पंपात जावे लागत आहे. पंपावरील सीएनजी लवकर संपत असल्याने या गाड्यांच्या फेर्याही वाढल्या आहेत.