

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 6 ते 14 अनियमित वयोगटातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम 1 जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे. ही मोहीम 15 जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक आदी उपक्रमांची अंमलबजावणी शाळांमध्ये सुरू आहे. मात्र अद्याप राज्यात काही ठिकाणी काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेसाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन सदर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहीम अंतर्गत 3 ते 6 वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत. तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजी मध्ये जात नाहीत व 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोधमोहिम घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी केले आहे.