

रत्नागिरी : मुंबईहून रत्नागिरीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबावर आरे-वारे येथे चार अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. दोन गाड्या आडव्या लावून पर्यटकांच्या वाहनाला अडवून शिवीगाळ, मारहाण करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रवीण हरिश्चंद्र कोरे (४८, रा. दहिसर पश्चिम, मुंबई) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, कोरे हे कुटुंबीयांसह आरे-वारे येथे जात असताना त्यांच्या वाहनासमोर चार अज्ञातांनी एमएच-४६-डीए-९७८४ व एमएच-४६-सीई-७४८५ या गाड्या आडव्या लावून मार्ग अडवला. यानंतर संशयितांनी कोरे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारल्यानंतर संशयितांनी कोरे यांच्या डोक्यावर, कानावर व हातावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करत एका संशयिताने चाकू काढून अंगावर धाव घेतली. तसेच, त्यांच्या भावाला व पुतण्यालाही मारहाण केली. या झटापटीत कोरे यांची सहा ग्रॅमची सोन्याची चेन व नऊ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी हरवली. यानंतर संशयितांनी काही अंतरापर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत ‘तुमचा नंबर आम्ही घेतला आहे, तुम्हाला शोधून ठार मारू’ अशी धमकी देत तेथून पसार झाले. या घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.