

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेली विमानसेवा आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर असून रत्नागिरी विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या मे महिन्यात येथून विमान उड्डाण सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
विमानतळ परिसरात सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून सुमारे २५ एकर क्षेत्रांत ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे भव्य टर्मिनल उभारले जात आहे. इमारतीतील सीलिंगचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून भिंतींचे काम वेगाने सुरू आहे.
लवकरच रंगरंगोटीला सुरुवात होणार आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कामगार आणि २० अभियंते कार्यरत आहेत. प्रकल्पाची गुणवत्ता राखण्यासाठी कामाचे विभाजन विविध कंपन्यांमध्ये करण्यात आले आहे.
मुख्य इमारतीचे काम न्याती कंपनीकडे असून अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी एस. एस. पाटील कंपनीकडे देण्यात आली आहे. सध्या रस्त्यांचे सपाटीकरण सुरू असून पुढील टप्प्यात डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच संपूर्ण विमानतळाच्या प्रकाशयोजना व विद्युत कामांची जबाबदारी सोनी इलेक्ट्रिककडे सोपवण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष पाठपुरावा केला असून राज्य शासनाच्या निधीतून कामाला गती मिळाली आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार एप्रिलअखेर सर्व तांत्रिक व बांधकाम प्रक्रिया पूर्ण होणार असून, मे महिन्यापासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटन व अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.