

रत्नागिरी : येथील विमानतळाच्या विकासाला आता गती मिळाली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची हवाई कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारण्यास मदत होणार आहे. रत्नागिरीची टर्मिनल इमारत एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेग देण्यात आला असून अन्य कामांचा निपटारा होण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून प्रवासी हवाई वाहतूक सुरू व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या प्रयत्नांना यश येत आहे. मागील काही येथील महिन्यांपासून विकासकामांनी वेग घेतला आहे. आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. या भागाला भेट देत अधिकारी व ठेकेदारांशी वारंवार चर्चा करीत असतात. नुकतीच आ. किरण सामंत यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या अधिकार्यांची बैठक घेतली, यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते. विमानतळासाठी डीव्हीओआर ही नेव्हीगेशन यंत्रणा बसवण्यासाठी 7.22 हेक्टर जमीन कोस्टगार्डला लवकरात लवकर हस्तांतरीत करण्याबाबत प्रांताधिकार्यांना सूचना करण्यात आली. त्याव्यतिरिक्त आणखी 7 हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. कमी द़ृश्यमानता असताना पायलटला सुरक्षित विमान उतरवता येण्यासाठी आवश्यक असणारे इन्स्ट्रूमेंट लॅण्डींग सिस्टीम बसवण्यासाठी आणि विमानतळाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील, यासाठी आणखी पाच ते सात हेक्टर जागा संपादीत करण्यावरही चर्चा करण्यात आली.
विमानतळावरील अनेक महत्त्वाची विकासकामे सध्या वेगाने सुरू आहेत. नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम जवळपास 35% पूर्ण झाले आहे. एमएडीसीने हे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. शहरातून विमानतळापर्यंत केबल टाकण्याचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. याबाबत बांधकाम विभाग आणि प्रांत अधिकारी यांच्यात चर्चा होऊन लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल. विमानतळावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी रस्त्याला पॅरलल टॅक्सी ट्रॅकच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. हा ट्रॅक कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी विमानतळाच्या या सर्व विकास कामांमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.