

देवरुख : रत्नागिरी-देवरुख मार्गावरील आंबव गावाजवळ मंगळवारी (दि. १९) दुपारी एक भीषण अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एक कार रस्त्यावरून थेट १० फूट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील दांपत्य सुखरूप बचावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साडवली येथील साळवी दांपत्य कारने (क्र. MH 08 Z 8738) रत्नागिरीच्या दिशेने येत होते. आंबव नजिक आले असताना अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याशेजारी असलेल्या सुमारे १० फूट खोल झाडीझुडपांमध्ये जाऊन कोसळली.
अपघात इतका मोठा होता की कार रस्त्यावरून खाली जाऊन अडकली. मात्र, सुदैवाने गाडीतील साळवी दांपत्याला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय या अपघातातून पुन्हा एकदा आला.
दरम्यान, या अपघाताची पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.