

रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवनच्या कामांना निधीअभावी ब्रेकच लागला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत १ हजार ४१२ कामांपैकी ६०४ कामे पूर्ण झाली आहेत. तर त्यापैकी केवळ ३८४ पूर्ण कामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. पाणी पुरवठा योजनांच्या कामांवर १ हजार १६७ कोटी ७३ लाख रूपयापैकी ६०९ कोटी ६७ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. अद्याप निधीअभावी कामे खोळंबली आहेत. निधी आल्यानंतर व पावसाळ्यानंतरच खऱ्या अर्थाने कामांना गती मिळणार आहे.
जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे घरोघरी शुध्द, चांगले पाणी मिळावे, यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या वतीने राज्यात जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाना नळजोडणी देवून कायमचा पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाड्या, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश होता.
पहिल्या टप्प्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी पाणी आले. मात्र त्यानंतर जलजीवनच्या कामांना उतरती कळा मिळाली. निधीअभावी जलजीवनच्या कामांना ब्रेकच लागला. काही कामे पूर्ण होवून ही गावोगावी टँकरने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे जलजीवनच्या कामांवर विरोधकांकडून सडकून टीकाही झाली. जिल्ह्यात १ हजार ४२८ कामे पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आले. ६०४ योजनांची कामे पूर्ण झाली तर प्रत्यक्षात ३८४ योजनांतील पूर्ण कामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. त्यावर कोट्यवधीचा खर्च झाला आहे.
५८४ गावे हर घर जल घोषित
जिलह्यातील ५८४ गावांमध्ये नळजोडणीची काम पूर्ण झाली आहेत. ही गावे हर घर जल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उर्वरित ८४४ गावे हर घर जल घोषित करणे बाकी आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार १६१ कुटुंबापैकी ३ लाख ८८ हजार ४२९ कुटुंबांना घरगुती स्तरावर नळजोडणी देण्यात आली आहे. त्या कुटुंबांच्या घरातील नळाला पाणी आले आहे.