

रत्नागिरी : पुढील महिन्यात एक सप्टेंबरपासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही. त्यामुळे सवलतधारकांनो ३१ ऑगस्टपूर्वी स्मार्ट काढून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाखजणांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे. त्यापैकी लाखांहून अधिक कार्डचे वितरण केले आहे.
एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड महत्वाचे ठरणार आहे. १ सप्टेंबरपासून हे सवलतीचे कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनी नोंदणी करावी, अन्यथा सवलतऐवजी १०० टक्के तिकिटाचे पैसे द्यावे लागणार आहेत. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची पात्रता आणि सवलतीचा लाभ डिजिटल पध्दतीने नोंदविता येणार असून भविष्यात तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वाची मानली जात आहे. स्मार्ट कार्डसाठी जिल्ह्यात १००हून अधिक एजंटांची नियुक्ती केली आहे. स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये शुल्कात कार्ड देण्यात येत आहे. रत्नागिरी बसस्थानक लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर यासह विविध बसस्थानकात स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत.