

रत्नागिरी: केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ थेट शेतकर्यांना मिळावा, यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख 87 हजार 936 इतके खातेदार असून आतापर्यंत 2 लाख 30 हजार शेतकर्यांनी फार्मर आयडी काढली आहे, तर 2 लाख 58 हजार 154 शेतकर्यांनी फार्मर आयडी अद्याप काढलेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात येणार्या चाकरमान्यांनी याकडे लक्ष देवून फार्मरआयडी काढून घ्यावी, अन्यथा पीक विम्यासह विविध लाभ शेतकर्यांना मिळणार नाही.
शेतकरी ओळख तयार करण्यासाठी शासनाचा हा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. शेतकर्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याला वारंवार प्रमाणिकरणांची आवश्यकता राहणार नाही. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकर्याने आपला सातबारा आधार लिंक करायचा आहे. जेणेकरून तुम्हांला एक फार्मर आयडी मिळणार आहे. ज्या शेतकर्यांकडे फार्मर आयडी नाहीत त्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर शेतकर्यांनी फार्मर आयडी काढावी व शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवहन करण्यात आले आहे.
शेतकर्याला एक युनिक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकाच्या आधारे, शेतकर्यांना विविध सरकारी योजना जसे की, पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, पीक कर्ज आणि इतर कृषी अनुदानाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. या योजनेत शेतकर्यांनी जमीन, पिके आणि इतर कृषीविषयक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांची गैरसोय दूर होणार आहे.