

खेड : ऐतिहासिक रसाळगड किल्ल्यावर मंजूर झालेल्या जनसुविधा केंद्राच्या कामाला गेल्या आठ महिन्यांपासून वनविभाग आणि पुरातत्त्व विभागातील जागेच्या वादामुळे स्थगिती मिळाली होती. या ठप्पाविरोधात घेरारसाळगड गावचे शिवभक्त रामचंद्र बाबू आखाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी तहसिलदार कार्यालय खेड येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या इशार्याची तातडीने दखल घेऊन पुरातत्त्व व वनविभागाने दोन बैठका घेऊन चर्चा केली.
अखेर दोन्ही विभागांनी ऑनलाईन परवानगी प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करून काम त्वरित सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे आखाडे यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या लढ्यात सहकार्य केलेल्या ग्रामपंचायत घेरारसाळगड, परिक्षेत्र वन विभाग दापोली, पुरातत्त्व विभाग रत्नागिरी, तहसिलदार कार्यालय खेड, खेड पोलिस, पत्रकार व महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त यांचे त्यांनी आभार मानले.