

रत्नागिरी : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचे शिंपणे म्हणजे रंगपंचमी महोत्सव. दिवसभर चालणारी लाल रंगाची उधळण आणि प्रसाद म्हणून मटण-भाकरी हे या उत्सवातील प्रमुख आकर्षण, फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून शिंपणे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षी शुक्रवारी (दि.२८) हा उत्सव रंगणार आहे.
महाराष्ट्रात आगळा वेगळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसबा संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवाची सुरूवात व शेवट ढोल ताशांच्या गजरात काढल्या जाणार्या फेर्याने होते. दुपारी ३ च्या दरम्यान उत्सवामधील काढला जाणारा फेरा सर्वाधिक महत्वाचा असतो. या फेर्यामध्ये बैलगाडीमधून रंगाची पिंपे भरून ठेवली जातात. या पिंपामधील लाल रंग फेर्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवला जातो. याचबरोबर फेर्याच्या दुतर्फा असणार्या घरांमधूनही भक्तगणांच्या अंगावर लाल रंगाची उधळण केली जाते. सकाळी ६ वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरुवात होते. दुपारनंतर उत्साह आणखी वाढत जातो. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तगण दर्शनासाठी रांगा लावतात.
हा उत्सव शेकडो वर्षे कसबा संगमेश्वर येथे साजरा केला जात आहे. उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात येते. रात्रीच्या वेळी तर दिव्यांच्या माळांनी सजलेली ही मंदिरे वातावरणातील भक्तीभाव वाढवतात. रात्री १० च्या दरम्यान कसबा व संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना हौद फोडण्यात येतो. व प्रसाद वाटप करण्यात येतो.
मानाचा नारळ देऊन पाण्याचा प्रसिद्ध जाखमाता देवी माहेरवाशिणी व अन्य महिला वर्ग देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल होतात. दुपारनंतर सालाबादच्या रखवालीचे नवस देण्यास सुरुवात होते, यामध्ये नारळ, कोंबडे व बकरे यांचा समावेश असतो. दरवर्षी प्रत्येक व्यक्तीची रखवाली ठरलेली असते. ती या दिवशी देण्याची प्रथा आहे. दिवसभर दिल्या जाणार्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात येतो. या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणार्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रितीने मटण -भाकरीचे वाटप करण्यात येते. शिंपणे उत्सवाला आलेला प्रत्येक भक्तगण मटण भाकरीचा प्रसाद घेतल्याशिवाय आपल्या घरी परतत नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे.
या शिंपणे उत्सवामध्ये लहान मुलांना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधण्यात येतात. शिंपणे उत्सवामध्ये भक्तगणांचा सर्वाधिक उत्साह दिसतो तो दुपारी ३ च्या दरम्यान निघणार्या मुख्य फेर्यामध्ये, कसबा येथे हा फेरा गणपती मंदिर येथून तर संगमेश्वरमधील फेरा दोन ठिकाणांहून निघतो. फेरा जसजसा पुढे जाईल, तसतशी भक्तगणांची संख्या वाढू लागते. संगीताच्या तालावर हजारो पाय थिरकायला लागतात. जवळपास ४ तास हा उत्साह असाच सुरू राहतो. कसबा संगमेश्वर येथे घराघरात दूर दूरहून असंख्य पाहुणे मंडळी दाखल होतात. प्रत्येक घरात काजूगर घातलेले मटण, वडे व भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवितात. यामध्ये महिलांचाही समावेश मोठा सहभाग असतो. एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान मोठा असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगाने अक्षरशः न्हाऊ घालतात.
उत्सवात लाल रंगाची उधळण केली जाते. उत्सवात काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरीचा प्रसाद घेतला जातो. महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. या उत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे.