

रत्नागिरी : कोकणचा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध असून देशाला सुमारे 1300 कोटींचे परकीय चलन मिळवून देतो; मात्र हे पीक घेणारा शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत सापडला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
रत्नागिरीतील बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने खर्च होऊनही आंबा उत्पादन केवळ 5 ते 10 टक्क्यांवर आले आहे, तरीही शासनाकडून मिळणारी मदत अत्यल्प असून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.
शेट्टी म्हणाले की, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही. आजवर आम्हीच सरकारला भरभरून दिले आहे; मात्र आता शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. तसेच 220 रुपयांच्या मदतीवरून स्थानिक लोकप्रतिनिधींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत, तर 15 मे रोजी मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देण्यात येईल. मेळाव्याला विनायक राऊत, बाळ माने, गणेश गावकर, बावा साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.