

राजापूर : येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. विहिरीची वैशिष्ट्यपूर्ण रचना, परिसरातील तटबंदीचे अवशेष आणि इंग्रज वखारीशी असलेला संबंध यामुळे या वास्तूच्या कालखंडाबाबत नव्याने संशोधनाची गरज अधोरेखित होत आहे.
इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांनी नुकतीच या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी सहकार्य केले. पाहणीदरम्यान विहिरीची बांधकामशैली, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि परिसरातील अवशेषांचा अभ्यास करण्यात आला.
इंग्रज वखार परिसरातील या विहिरीभोवती सुमारे 30 फूट रुंद व 20 फूट लांबीचा भाग दगडी बांधकामाने बंदिस्त करण्यात आला आहे. या संरचनेत उत्तर व दक्षिण दिशेकडून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. वरचा भाग तुलनेने अलीकडील काळातील वाटत असला तरी खालचा भाग अधिक प्राचीन असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे संरचनेचा काही भाग सध्या गाडला गेला आहे.या बंदिस्त भागाच्या मध्यभागी असलेली विहीर वरून चौकोनी तर तळाशी गोलाकार स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ती कातळात खोदून तयार केल्याने स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने तिचे महत्त्व वाढते.
काही अभ्यासकांच्या मते, या विहिरीची रचना मध्ययुगीन काळातील ‘भद्रा’ प्रकारच्या विहिरींशी साधर्म्य दर्शविते. तथापि, केवळ स्थापत्यशैलीच्या आधारे या विहिरीचा संबंध कोणत्याही विशिष्ट राजवंशाशी जोडणे योग्य ठरणार नसल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे. विहिरीशी संबंधित कोणताही शीलालेख, ताम्रपट किंवा अन्य लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने तिचा कालखंड निश्चित नाही. इतिहासाच्या नोंदींनुसार मध्ययुगीन काळात कोकण प्रदेशावर शिलाहार आणि यादव राजवटींचे वर्चस्व होते. या कालखंडात जलव्यवस्थापन, मंदिर स्थापत्य आणि दगडी बांधकामांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या विहिरीच्या स्थापत्य वैशिष्ट्यांचा त्या परंपरेशी काही संबंध असण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
राजापूर प्राचीन काळापासून महत्त्वाचे व्यापारी बंदर राहिले आहे. इंग्रजांनी सतराव्या शतकात येथे वखार उभारण्यापूर्वी स्थानिक गढी, कोट, संरक्षणात्मक चौकी किंवा व्यापारी केंद्र अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. वखारीभोवतीचे तटबंदीचे अवशेष, खंदकाची रचना, बुरुजांचे संकेत आणि ही प्राचीन विहीर शक्यतेला अधिक बळ देत आहे. पुरातत्त्व विभागाकडून शास्त्रीय सर्वेक्षण, स्थापत्य शास्त्रीय तुलनात्मक अभ्यास किंवा उत्खनन झाल्यास या इतिहासावर अधिक प्रकाश पडू शकतो. तोपर्यंत ही विहीर राजापूरच्या प्राचीन वारशाचा एक महत्त्वपूर्ण दुवा आणि संशोधनासाठी उपयुक्त ऐतिहासिक ठेवा म्हणूनच ओळखली जात आहे.