

वैभव पवार
गणपतीपुळे : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विविध उद्योगांपैकी अत्यंत महत्वाचा आणि देशाला जगाच्या पाठीवर नवी ओळख देणारा धीरूभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा प्रकल्प वाटद खंडाळा परिसरात सुरू करण्याच्या द़ृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला वाटद पंचक्रोशीसह जवळच्या ग्रामपंचायतींचाही या एमआयडीसी आणि प्रकल्पाला पाठिंबा वाढत आहे. या भागात येणार्या या प्रकल्पांबाबत शेतकरी, कष्टकरी, तरुण वर्गासह या परिसरातील सर्वसामान्य लोकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील लोकभावना लक्षात घेऊन विनाशकारी प्रकल्प टाळून प्रदूषण विरहित प्रकल्प याठिकाणी सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य करून लोकांच्या शंका दूर केल्या आहेत. त्यामुळे वाटद परिसरात असणारा वाढता विरोध कमी होऊन एमआयडीसी व प्रकल्पाला समर्थन लाभत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वाटद खंडाळा येथे जनप्रबोधनात सहभाग घेऊन लोकांच्या शंका व गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळे आता पाठिंबा देणार्यांची संख्या वाढत आहे.
या परिसरात वाढती बेरोजगारी, स्थलांतर आणि इतर बाबी टाळण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली असून, नामदार उदय सामंत? ? यांच्या दूरद़ृष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर सर्वसामान्य लोकांना आणि बेरोजगार तरुणांना हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार असल्याची अपेक्षा आहे. बाहेरून येऊन आणि स्थानिक लोकांना भडकवण्याचे काम करणार्यांना याठिकाणी थारा मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पाला वाटद खंडाळा येथील खंडाळा परिसर व्यावसायिक मित्र मंडळ, लक्ष्मी केशव ट्रस्ट कोळीसरे, वाटद मिरवणे ग्रामस्थ, लोकनेते शामरावजी पेजे सामाजिक शैक्षणिक विकास संस्था रत्नागिरी, बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद खंडाळा, नवतरुण मित्र मंडळ खंडाळा, रत्नागिरी जयगड ट्रान्स्पोर्ट युनियन, सलून व्यावसायिक संघटना खंडाळा त्याचप्रमाणे वरवडे, कळझोंडी, वैद्यलागवन, जयगड, सैतवडे आदी भागातील ग्रामस्थ व सरपंचांनी तसेच प्रतिष्ठित व जाणकार ग्रामस्थ आदींनी एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच अनेक संस्था संघटनांनी याबाबत लेखी निवेदनाद्वारे समर्थन दर्शविले आहे.