

Mumbai Goa Highway Accident
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने निघालेला टेम्पो हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर महामार्गावर आला असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. धडक जोरदार असल्याने टेम्पोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताची माहिती घेतली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोचालक अथवा वाहनावरील नियंत्रणासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.