

लांजा : ऐन मे महिन्यातच कोसळणार्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे लांजा शहरात मुंबई- गोवा महामार्गाची अक्षरशः दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्ग चौपदरीकरण सुरू असलेल्या अर्धवट कामाचा नाहक त्रास वाहन चालक, नागरिकांसह व्यापार्यांनाही सहन करावा लागतो आहे. शहरात सर्वत्र चिखल, रत्यावर येणारे गटारांचे सांडपाणी, खाच-खळग्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
लांजा शहरातील नागरिकांना होणारा त्रास पाहता महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात झाला मात्र मुसळधार पावसाने खडी वाहून गेली आहे. त्यामुळे पावसाने सर आली धावून रस्ते गेले वाहून अशी परिस्थिती सद्या लांजा शहरात पहायला मिळते आहे. लांजा शहरात सुरुवातीपासून महामार्ग चौपदरीकरण कामामुळे बाजारपेठत होणारी अडचण, वाहतूक कोंडी, गटारे, पाण्याचा निचरा याबाबत प्रश्न सोडवावेत व नवीन प्रश्न उद्भवु नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ व व्यापार्यांनी याआधीच महामार्ग विभागाला सहकार्य केले आहे. मात्र सुरू असलेल्या कामामुळे शहरात वाहतूक, रस्ते, गटारे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महामार्ग विभागाकडून पावसाळी कामे लांजा शहरात अपुरी असल्याने याचा त्रास शहरवासीय व वाहन चांलकाना सहन करावा लागतो आहे. महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खाड्यांमुळे अपघात होण्याची दाट श्यक्यता वर्तवली जाते आहे. मे महिन्यातच पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना अजूनही पावसाचे चार महिने बाकी आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शहरात महामार्गावर मोठं मोठ्या खंड्यामध्ये पाणी साचून राहत आहे. तर काही ठिकाणी तलावाप्रमाणे शहरात पाणी साठून राहत आहे.
शहरात महामार्गाच्या अर्धवट कामामुळे साठून राहिलेल्या चिखलामध्ये वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान एक खासगी ट्रॅव्हल्स चिखलात अडकल्याने तब्बल दोन तास बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊन एकेरी वाहतूक सुरू होती. पावसाची संततधार सुरू असून लांजा शहरात चिखल, पावसाचे सांडपाणी व खाड्यांचा सामना वाहन चालक, प्रवाशांना, स्थानिकांना करावा लागत आहे. लांजा हायस्कूल ते कुक्कुटपालन या अर्धा ते एक किलोमिटरच्या अंतर च्या महामार्ग रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे.