

रत्नागिरी : गणेशोत्सवास पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. मुंबईसह इतर भागातून कोकणात येण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून ५ हजार २२० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे गट आरक्षण आज सोमवारपासून सुरुवात झाले आहे. दरम्यान, गणेशोत्सवानंतर चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईसह इतर ठिकाणी जातात. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने २,५०० बसेसचे नियोजन करण्यात आले असून आरक्षणास प्रारंभ झाले आहे. जास्तीत जास्त प्रवासी, चाकरमान्यांनी आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या मूळ गावी म्हणजेच कोकणात येत असतो. मुंबई, पुण्यासह इतर शहरात काम करणारे चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येत असतात. १० दिवस उत्साहात सण साजरे करीत असतात. त्यानंतर चाकरमान्यांना परतीचे वेध लागतात. चाकरमानी परतीचा प्रवास दरवर्षीप्रमाणे लाडक्या लालपरीनेच करतो. प्रवाशांचा प्रवास चांगले, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी २,५०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. त्याचे आरक्षण सुरू झाले आहे. तसेच ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात ५ हजारहून अधिक बसेस येणार आहेत. आज सोमवारपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षण सुरू झाले आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही महिला, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.
‘इथे’ करा ऑनलाईन आरक्षण
गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाचे वतनी आरक्षण खुले झाले आहे. त्यासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळासह एमएस आरटीसी बस आरक्षण मोबाईल ॲप, सर्व बसस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जास्तीत जास्त जणांनी ऑनलाईन आरक्षण करावे. तसेच ४० प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षणही करता येणार आहे.