

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा पुढे आला तर त्याचे स्वागतच केले जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांची गरज असून, अणुऊर्जा प्रकल्पामुळे वीज, रोजगार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली असती. आता अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध कराच, मग समोरून काय करतो ते बघा, असा थेट इशाराच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी प्रकल्प विरोधकांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर परिसरात अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले की, जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प येणे गरजेचे आहे. अणुऊर्जा प्रकल्प यापूर्वीच झाला असता, तर राज्याला मुबलक वीज उपलब्ध झाली असती. त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असत्या.
पावसाच्या अनिश्चिततेचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, आणखी चार दिवस पाऊस पडला नसता तर पाण्यासोबतच विजेचाही प्रश्न निर्माण झाला असता. अणुऊर्जा प्रकल्पामुळे राज्याला दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मिळाली असती. हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या आणि बेरोजगारी कमी झाली असती.