

रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराशी आमचा संपर्क झालेला नसून सध्या ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्याची कोणतीही गरज नसल्याचे स्पष्ट मत उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणाशीही बैठक घेतलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगरबाबत नाहक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सध्या कोणालाही पक्षात घेण्याची आवश्यकता नसून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्र्यांना भेटत असतात. मात्र अशा भेटींनंतर लगेच राजकीय चर्चांना उधाण येते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत दररोज बोलले नाहीत तर उबाठाचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
नवी मुंबईतील एका उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी शहरासाठी मंजूर झालेल्या साडेचार कोटी रुपयांच्या निधीबाबत बोलताना सामंत म्हणाले की, पालिकेतील भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना समान निधी देण्यात आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.