Fishing Ban : मासेमारीबंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढणार

मत्स्यसंपदा संवर्धनाला प्राधान्य; विधानसभेत ना. नितेश राणे यांची घोषणा
Nitesh Rane
Nitesh Rane pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : राज्यातील सागरी मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या सागरी हद्दीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

सध्या राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमान नियमांनुसार १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू आहे. मात्र, प्रजनन काळात मोठ्या प्रमाणावर लहान माशांची होणारी मासेमारी रोखण्यासाठी आणि समुद्रातील मासेसाठा टिकवून ठेवण्यासाठी हा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्थांकडून अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती.

या निर्णयामुळे मासे प्रजननासाठी आवश्यक असलेला कालावधी अधिक सुरक्षित होणार असून समुद्रातील मत्स्यसंपदा वाढीस मदत होईल. त्याचबरोबर पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांच्या जीवितालाही संरक्षण मिळणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news