

लांजा : लांजा तालुक्यात तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार ‘मिनी महाबळेश्वर’ माचाळ येथे शुक्रवारी सायंकाळी मोठी दरड कोसळल्याने माचाळ गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे वर्षांसहलीचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक गावातच अडकून पडले होते. अखेर पालू ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर गाडे तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या कार्यतत्परतेमुळे जेसीबी यंत्राच्या सहायाने दोन तास दरड हटविण्याचे काम भरपावसात सुरू होते. कोसळलेली दरड हटविल्यानंतर माचाळ गावचा मार्ग वाहतुकीला पूर्ववत झाला. त्या नंतर माचाळ गावामध्ये अडकलेल्या पर्यटकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
प्रशासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता गावच्या नागरिक व उपसरपंच सागर गाडे यांनी जेसीबीला बोलावून दरड हटविल्याने. पर्यटकांनी आभार मानले, सध्या कोकणात गणेशोत्सव सुरू असून मुंबई-पुण्यामधून मोठ्या संख्येने आलेले नागरिक माचाळच्या दिशेने वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी जात असल्याने माचाळ मध्ये पर्यटकांची सद्या गर्दी दिसून येत आहे.