

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू होवूनसुद्धा जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनचा बॅकलॉक भरून काढला आहे. १ जून ते ९ ऑगस्ट यादरम्यान जिल्ह्यात १७ हजार १८६ मि.मी., तर सरासरी १ हजार ९०९.५८ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. एकूण ५६.७६ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ हजार ८५२ मिमी म्हणजे ५२ टक्केच पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे धरणे, नद्या तुडुंब भरलेल्या आहेत.
मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आठ दिवसांतच एक महिना पडेल इतका पाऊस झाला होता. जून, जुलै महिन्यात तर मुसळधार पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी मान्सून वेळेवर येवून सुद्धा पावसाने दडीच मारली. जून महिन्यात चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. पिके पिवळी पडत होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला. दुबार पेरणीचे संकट टळले. खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक ५२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात, नाचणी पेरणी आणि पुनर्लागवड पूर्ण झाली आहे.
भात शेतीला पूरक असा पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत., तर दुसरीकडे जिल्ह्यात जून महिन्यात ही १५हून अधिक टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. दमदार पावसामुळे जिल्ह्यावरील पाणी टंचाई दूर झाली आणि त्यानंतर टँकरही बंद करण्यात आले. नदी, धरणातील पाणी साठा फूल्ल झाला आहे. एकंदरीत, पावसाने उशिरा सुरुवात करूनसुद्धा जुलै महिना कोकणासाठी लकी ठरला आहे. गतवर्षापेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची गरज आहे.
ऑगस्टमध्ये पाऊस ओसरला
जिल्ह्यात जून महिन्यात म्हणावा तितका पाऊस झाला नाही. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे पाऊस उशिरा सुरू होवूनसुद्धा जूनचे बॅकलॉक भरून काढले. मात्र, ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पाऊस ओसरला आहे.