

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील मत्स्यसंपदेच्या संवर्धनासाठी आज (१ जून) पासून दोन महिन्यांच्या वार्षिक मासेमारी बंदीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील हजारो यांत्रिक मासेमारी नौका किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, भाट्ये, पुणस, दाभोळ, हर्णे, बाणकोट, विजयदुर्ग, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या प्रमुख मासेमारी बंदरांमध्ये नौकांच्या रांगा लागल्या असून बंदर परिसरात शांतता पसरली आहे.
मान्सून काळ हा मासळीच्या विविध प्रजातींच्या प्रजननाचा हंगाम असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिक मासेमारीवर बंदी घालण्यात येते. बंदी काळात नियमांचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कठोर कारवाई होणार आहे.