

राजापूर : कष्टकरी अशी ओळख असलेला बंजारा समाज सर्वदूर पसरलेला आहे. राजापूर तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच भागात असलेल्या या समाजाचे प्रश्न आणि समस्या सोडविणे हे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यच आहे. त्यामुळे भविष्यात या समाज बांधवांचे प्रश्न सोडवितानाच राजापुरातील बंजारा समाजाचा तांडा वस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
राजापूर तालुका बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाच्या वतीने 287 व्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवानिमित्त शहरातील गुजराळीतील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी हॉलमध्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग चव्हाण होते.यावेळी धनसिंग चव्हाण म्हणाले, बंजारा समाजाचे स्वप्न असलेले संत सेवालाल भवन तालुक्यात उभे करण्याचे काम लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांचे सहकार्याची आवश्यकता आहे. आपला समाज हा कष्टकरी आहे. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपण कष्ट करत असतो. मात्र समाजाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. एकत्र येऊन आपले प्रश्न सोडविले पाहिजेत, असे सांगितले.
सकाळच्या सत्रात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसह जकात नाका ते यशोदिन सृष्टी सभागृह अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेवक ॲड. जमिल खलिफे, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, रवींद्र नागरेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, कल्याणी रहाटे, जिल्हा बँक संचालक महेश खामकर, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री लाड, भरत लाड, प्रा. मारुती कांबळे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, सचिव राजेंद्र बाईत, समाजसेविका माधवी हर्डीकर तसेच ठेकेदार रविकांत भामत, संघाचे उपाध्यक्ष ईश्वर राठोड, अर्जुन राठोड, उमेश उडेद, लक्ष्मण राठोड, सुरेश राठोड, नामदेव राठोड, काशिनाथ राठोड, बळीराम जाधव, विलास राठोड, रेखू जाधव, संजय चव्हाण, सचिन राठोड उपस्थित होते.