

रत्नागिरी : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिर गॅस जहाज जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने काल हा आदेश दिला. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत जहाजावरील माल उतरविण्यास मनाई करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू पोर्टच्या बाहेर हे जहाज जाता कामा नये, असे आदेशात म्हटले आहे. बोगस कागदपत्र दाखवून माल वळवला गेल्याची धक्कादायक माहिती या प्रकरणात पुढे आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की या प्रकरणातील झांग यूनियन इंडरनॅशनल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. बचाव पक्ष एलपीजी आमिर गॅस ही आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने जहाजावर असलेला 'एलपीजी (mix) in bulk' माल उतरवण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच जहाज सध्या जयगड पोर्ट येथेच थांबवून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार जेएसडब्ल्य जयगड पोर्ट लि. यांना जहाजाला बाहेर जाण्यास परवानगी (Outward Port Clearance) देऊ नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याशिवाय, जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये आणि त्यावरील माल उतरवला जाऊ नये, याची खात्री करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या दरम्यान,आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आवाहन सर्व संबंधित पक्षांना करण्यात आले आहे.
या जहाजाबाबत वेगळीच माहिती पुढे आली आहे. या जहाजाचे दोन मालक आहेत. परंतु प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. गॅस भरुन नेण्यासाठी ते भाडे कराराने घेतले होते. दोन कंपन्या आहेत त्यापैकी एक कंपनीला ते पाकिस्तानला न्यायचे होते. इराकमध्ये हा कार्गो लोड झाला. मात्र हे जहाजाचा मार्ग बदलल्याचे मुळ जहाज मालकाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी याबाबत तक्रार केली. लोड करण्यात आलेला माल पाकिस्तानसाठी जाणार होता. परंतु या दोन मालकांच्या वादातून शिपमॅनेजमेंट चालवते तो मास्टर बदलला आणि दुबईला दुसऱ्या मास्टरला चुकीची माहिती दिली. जयगड बंदरात जाण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्यात आल्याची माहिती या चौकशी पुढे आली. मुळ मालकाच्या तक्रारीनंतर हा सर्व बनाव उघड झाल्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेत हा निर्णय दिला आहे. याबाबत स्थानिक शिपिंग एजन्ट मिलिंद बनप यांनी कोर्टाच्या आदेशबाबत ही माहिती दिली.