Hapus mango : कोकणातील फळांचा राजा अडकला टॅरिफच्या विळख्यात
रत्नागिरी : आम्ही गेले अनेक वर्षे कोकणातील हापूस आंबा पल्प अमेरिकेत घेत आहोत. मुळात मी रत्नागिरीतील असल्याने हापूस आंबा माझ्या आवडीचे फळ आहे, आता आम्ही ज्या अमेरिकेत नोकरी करत आहोत, त्याच देशाने 50 टक्के टॅरिफ वाढवल्याने याचा भुर्दंड अमेरिकेतील भारतीयांना सर्वाधिक बसणार असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून नोकरी करणारी गौरी खानविलकर यांनी ‘पुढारी’शी फोनद्वारे बोलताना दिली.
अमेरिकेने भारतासह काही देशांच्या कृषी उत्पादनांवर 50 टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयाचा थेट फटका कोकणातील हापूस आंबा पल्प उद्योगालाही बसणार आहे. विशेषत: रत्नागिरी हापूसच्या पल्पची मोठ्या प्रमाणात निर्यात अमेरिकेमध्ये होते. आता या पल्पच्या किमती 50 टक्क्यांनी वाढणार असल्याने तब्बल 25 कोटींचा अतिरिक्त कर बसणार आहे. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले असल्याचे कोकणातील आंबा बागायदारांनी सांगितले. भारतातून दरवर्षी सुमारे 15 हजार मेट्रिक टन आंबा पल्प निर्यात केला जातो. यापैकी सुमारे 300 कोटी रुपयांचा पल्प अमेरिकेला पाठवला जातो. कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून सुमारे 50 कोटी रुपयांचा हापूस पल्प अमेरिकेत जातो. उर्वरीत देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, युरोप आणि गल्फ देशांत पाठवला जातो. मात्र, अमेरिकेने केलेल्या नव्या टॅरिफमुळे या पल्पवर आता अतिरिक्त 150 कोटी रुपयांचा कर बसणार आहे. परिणामी, अमेरिकन बाजारात हा पल्प 50 टक्के महाग होईल आणि ग्राहकांमध्ये त्याची मागणी कमी होण्याची भीती व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
कोकणात हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या आंब्यापासून तयार होणारा पल्प केवळ देशात नव्हे तर परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे. विशेषत: अमेरिकेत कोकणातील पल्पची मागणी अधिक आहे. त्यामुळे हा टॅरिफ निर्णय कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांसाठी आर्थिक नुकसान करणारा ठरणार आहे. रासायनिक पदार्थ न वापरता नैसर्गिक पध्दतीने तयार होणारा हापूस पल्प ही आमची खासियत आहे. पण आता अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे आम्ही स्पर्धेत टिकू शकतो का हा मोठा प्रश्न आहेच, अमेरिकेतील भारतीय नागरिकांना याचे नुकसान सर्वाधिक होणार आहे. हा हापूस पल्प सर्वाधिक अमेरिकास्थित भारतीय विकत घेतात. असे मत रत्नागिरी पल्प निर्यातदार यांचे म्हणणे आहे. निर्यातदार संघटनांनी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेकडून लावण्यात टॅरिफचा फेरविचार व्हावा, अथवा भारत सरकारने काही सवलती जाहीर करव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. धोका असल्याचे कोकणातील सर्व आंबा बागायतदार आणि व्यापार्यांचे म्हणणे आहे.

